डॉ.आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या संघस्थानाला दिलेली भेट संघाला गौरवास्पद : निलेश गद्रे
डॉ.आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या संघस्थानाला दिलेली भेट संघाला गौरवास्पद
-निलेश गद्रे यांचे प्रतिपादन
पंढरपूर येथे बंधुता परिषदेचे आयोजन
पुणे : प्रतिनिधी
“ भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 जानेवारी 1940 कराड येथील संघस्थानाला व दि 15 फेब्रुवारी 1939 रोजी पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलन शिबिराला दिलेली भेट ही ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात असली तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून ही भेट अत्यंत गौरवास्पद आहे, कारण खुद्द भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते डॉ. आंबेडकरांनी संघ स्थानावरील शिस्त,समता,जातिभेदाचा अभाव ह्या गोष्टी पाहून व संघाच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि ते राष्ट्रीय स्वंय सेवक संघाविषयी प्रभावित झाले होते.ही भेट आजही सामाजिक समरसता आणि राष्ट्रउभारणीच्या कार्यासाठी प्रेरणा देणारी असून संघाला गौरवास्पद व भूषनावह आहे.” असे प्रतिपादन समरसता गतिविधि पश्चिम क्षेत्राचे संयोजक निलेश गद्रे यांनी समरसता मंच, पंढरपूर व शाहू शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुजराथी कॉलनी, पंढरपूर येथे बंधुता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर आयु. बाळासाहेब बनसोडे,पंढरपूर जिल्हा संघचालक डॉ रमेश सिद, जिल्हा कार्यवाह श्री प्रतापसिह टकले, तालुका संघचालक श्री जोशी काका, व्यवस्था प्रमुख श्री सारंग बडोदकर शाहू शिक्षण संस्थेचे सचिव श्री अभिजीत ढोबळे, आदित्य फत्तेपूरकर, श्री किरण सर्वगोड,सोमनाथ अवताडे,दिलिपराव घोले, श्री गुरु दोडिया, श्री अभिषेक कांबळे,जगदिश बाबर,अमोल लांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुढे निलेश गद्रे म्हणाले “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक अस्पृश्यता न पाळता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कमलाकर ठकार या स्वयंसेवकाला आपल्या संस्थेत प्राध्यापक म्हणून नोकरी दिली. डॉ.हेडगेवार यांना आपल्या जनता वृत्तपत्रातून श्रद्धांजली वाहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि संघाचे काही बाबतीत जरी मतभेद असले तरी संघाविषयी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही अपशब्द वापरलेले नाहीत, परंतु काँग्रेस पार्टी,कम्युनिस्ट ,मुस्लिम लीग इत्यादी संदर्भात डॉ.बाबासाहेबांच भूमिका आजही आपणांस त्यांनी लिहिलेले मूळ ग्रंथ वाचल्यास त्यामध्ये तीव्र आक्षेप घेणाऱ्या दिसतात. संघाने दलितांच्या,मागास वर्गाच्या आरक्षणाच्या मान्यतेच्या संदर्भात साल 1981, 1990,1994,2005 आणि 2007 साली असे पाच ठराव पारित केले आहेत.त्यामुळे संघाची भूमिका दलित आरक्षण विरोधी नसून दलितांच्या हिता संदर्भातच आहे अशी स्पष्ट भूमिका यातून दिसते. “असे ते म्हणाले.
गद्रे ह्यांनी सामाजिक चळवळीच्या इतिहासाचा संदर्भ देत म्हणाले की ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथातून स्पष्ट केल्या आहे की, आर्य बाहेरून आलेले नाहीत. परंतु त्या संदर्भात चुकीचे विमर्श डॉ.बाबासाहेबांच्या नावाने पसरवले जात आहेत.हे सत्य जर समाजासमोर यायचा असेल तर बाबासाहेबांनी लिहिलेले मूळ ग्रंथ आपण वाचले पाहिजे. इतकेच काय हैदराबादच्या निजामाने आपल्या संस्थानाच्या हद्दीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कधीही सभा घेण्याचा अधिकार दिलेला नाही.किंवा घेऊ दिल्या नाहीत. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निजामाच्या हैदराबाद संस्थानाच्या सीमेवर मकरंदपुर येथे व कसबे तडवळे येथे त्यांनी दोन परिषदा घेतल्या
मकरनपूर व कसबे तडवळा येथील सभेत निजामाला पूर्णपणे असहकार्य करण्याचे आवाहन दलित समाजाला त्यांनी केले.यातून बाबासाहेबांची भूमिका ही अधिक स्पष्ट आपल्याला समजून येते.डॉ.आंबेडकरांना संघाविषयी आपुलकी होते.तर संघाचे ज्येष्ठ प्रचारक दत्तोपंत ठेंगडीने ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची निवडणुकीची धुरा वाहिली.यातून हा जिव्हाळा दोन ही बाजूने होता.”
या बंधुता परिषदेचे प्रास्ताविक सामाजिक समरसता पंढरपूर जिल्हा संयोजक जगदीश बाबर यांनी केले. या प्रसंगी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पंढरपूरशी असणाऱ्या संपर्काबद्दलची माहिती दिली. शेवटी आभार प्रदर्शन सामाजिक समरसता पंढरपूर जिल्हा सह संयोजक अमोल लांडे यांनी मानले.मोठ्या संख्येने या या परिषदेला नागरिक उपस्थित होते.








