पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
पिंपळे गुरव विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
विज्ञानाधारित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा यांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी : प्रतिनिधी
भारतीय थोर शास्त्रज्ञ C. V. Raman यांनी २८ एप्रिल १९२८ रोजी लावलेल्या ‘रामन इफेक्ट’ या महत्त्वपूर्ण शोधामुळे देशभर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माध्यमिक विद्यालय, पिंपळे गुरव येथे राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने विद्यालयात विविध स्पर्धा व प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वैज्ञानिक कृतींचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले. विज्ञानाधारित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा यांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विज्ञानाचे महत्त्व, अंधश्रद्धा निर्मूलन आणि पर्यावरण संरक्षण या विषयांवर विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केली.

शाळेचे मुख्याध्यापक मुदगुण पांडुरंग शंकर यांनी आपल्या भाषणातून एआय तंत्रज्ञान आणि मानवी भावना यांतील तफावत स्पष्ट करताना विज्ञानाचा वापर जबाबदारीने करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या पर्यवेक्षिका व विज्ञान शिक्षिका विद्या साळी यांनी ‘रमण इफेक्ट’ची सविस्तर माहिती दिली. पारदर्शक वस्तूंवर (उदा. काच किंवा पाणी) प्रकाशकिरण पडल्यावर होणाऱ्या प्रकाशाच्या विखुरणामुळे त्याची तरंगलांबी बदलते, तसेच त्या पदार्थातील अणू-रेणूंना ऊर्जा मिळते, ही संकल्पना त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितली. या शोधाचा उपयोग पदार्थशास्त्र, रसायनशास्त्र आणि औषधनिर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘एआय कितपत उपयुक्त?’ या विषयावर नाटिका सादर करून त्याचे फायदे-तोटे प्रभावीपणे मांडले. विद्यार्थिनी नंदिनी समर्थ हिने विज्ञानावर आधारित स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

या कार्यक्रमास कविता चव्हाण, अंजली चौगुले, भावेश खैरनार, प्रिया नांगरे, मनोज तळपे, कृष्णराव टकले, अनिल गायकवाड, पूनम घोडके, सुनील दळवी, आशिष मिरोखे, ओंकार गावडे, अश्विनी दांगट, योगिता साळुंखे, निकिता गिरी व विद्या आवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता कांबळे यांनी केले.









